Thursday, July 18, 2013

तेवढ्यापुरतं

मी घराबाहेर पडतो तेव्‍हा थेंबांनी भरलेलं आभाळ जणू काही माझीच वाट पाहत असतं. मी चालू लागतो तेव्‍हा सगळे थेंब माझ्याचकडे पाहत असतात. टक लावून. एवढ्या उंचावरून माझा चेहरा दिसत नसावा त्‍यांना, पण माझी पावलं दिसतात. कधी विश्‍वासानं पडलेली, कधीच आपल्‍याच धुंदीत चाललेली, कधी गुणगुणत तर कधी मिणमिणत.

माझ्या मनाचा सूर त्‍यांना कसा सापडतो कुणास ठाऊक? पण तो सापडतो एवढं मात्र खरं!

एकदा का तो सूर सापडला, की ते एकेका थेंबांने डबडबलेलं ते आभाळ माझ्याकडे झेप घेतं. त्‍यांच्‍या त्‍या झेपेत माझीच आतूरता असते आणि मी तिकडे माझ्याच विचारात असतो. ते आभाळ असं अनेकदा पावसासोबत माझ्याकडे झेपावलं आहे. मला मात्र मान वर करून पहायची भीती वाटत असते. जर ते धावून येताना नाही दिसलं तर अपेक्षाभंग होणार! कितीदा करून घ्‍यावा? त्‍यापेक्षा न पाहिलेलंच बरं. तो नाही आला तरी काही वाटत नाही, पण तो येतो तेव्‍हा मोठं समाधान मिळत असतं.

मग ते सारे थंडगार थेंब आवेगानं येऊन बिलगतात मला. पाण्‍याची मोठी लाट रोंरावत येऊन आदळते जणू. मला त्‍या थेंबांना कधीच कवेत घेता येत नाही. पण मी खूप आसुसून अनुभवतो त्‍यांना. मोहरुनही येतो. अंतर्मुख होतो. फुलतो देखील.

पण हे सगळं खूप कमी काळासाठी असतं. जेवढा वेळ मी माझा सभोवताल, जग, माणसं सारं विसरुन त्‍यात रममाण होतो केवळ तेवढ्याच क्षणांसाठी. त्‍यानंतर पुन्‍हा ओहोटी सुरू. पावसाचा अनुभव तोच असतो. आनंदही तोच असतो. मात्र काही क्षणांपुरता त्‍याचा झालेला स्‍पर्श हरपलेला असतो. तो स्‍पर्श तेवढ्यापुरताच असावा.

चला, तेवढं तर तेवढं...

No comments:

Post a Comment