मनाचे काठ डोळ्यांच्या कडांपर्यंत पोचतात का?
मन अतिव समाधानाने, आठवणीने, प्रेमानं काठोकाठ भरुन ओसांडून वाहतं, तेव्हा डोळे झरु लागतात, ते त्यासाठी का?
तुझ्या सहवासात माझं मन भरतं, असं म्हणताना मला तृप्त झाल्याची भावना अनुभवाला येतंच नाही. कारण तू कितीही लाभलीस तरी कमीच पडतेस. तू सोबत असताना मला जे काही अनुभवाला येतं, जे जाणवत राहतं ते सारं मला नीट स्वीकारताही येत नसावं. एकाच वेळी ह्रदयात उष्ण आणि थंड अशी दुहेरी जाणिव होत राहते. कसा अर्थ लावायचा त्याचा? अर्थ सोड, ती अवस्था नीटशी अनुभवायची कशी, हेदेखील मला अजून कळलेलं नाही. मी निवांत असताना तुझ्या ओढीच्या तीव्रतेनं शरीर कंप पावण्याचा आणि अगदी अस्वस्थ असताना तुझ्या विचारानं मनाला शांतता लाभण्याचा अनुभव मला वारंवार येतो.
किती हा विरोधाभास?
विरोधाभास हा प्रेमभावनेतला कॉन्स्टन्ट असतो का गं?
म्हणूनच मनात जे काही उमलत राहतं त्याचे अर्थ लावण्याची, ते निव्वळ अनुभवण्याचीही माझ्या मनाची क्षमता मर्यादीतच वाटत राहते. त्या अनुभवाच्या आवेगाने मन प्रचंड थकून जातं. त्या वेळी मला कुठलीच नवी जाणिव-अनुभव नको असतो. मन क्षणभर कोरं करकरीत असावं असं वाटतं. तरीदेखील विहीरीच्या तळाला झरा फुटावा तसे तुझ्याबद्दलचे कितीतरी विचार उमळून वर येत राहतात; हे सतत घडत राहतं! ते सामावून घेता घेता माझा श्वासही थकून जातो. मनानं ती संपृक्तावस्था गाठली की शिणलेले गहिरे कढ दाटून येतात. मन जडावत जातं. आणि ते सारं मावेनासं झालं की डोळ्यांवाटे बाहेर पडतं. आणि त्याही क्षणी तू सोबत नसल्याची भावना आतल्या एका रिकाम्या जागेकडे बोट दाखबत राहते.
तृप्त होण्याची जागा तशीच रिकामी ठेवत मन असंच भरत जातं असतं का?



