ओंजळीतल्या गोष्टी देता नाही आल्या
तरी सुगंधाचा दरवळ माग काढतच जातो
ओल्या पायवाटेवरचं सुकून गेलेलं दवसुद्धा
काही वेळासाठी मग तरारून उठतं
जुन्या रोपांना क्षणभरासाठी का होईना
पुन्हा अंकुर फुटतो
कधीकाळी फुललेल्या चित्तवृत्ती
निमित्तमात्राने पुन्हा होतात ताज्या
आकाश अन् धरेच्या सीमा
क्षीतीजावर जुळलेल्या दिसतात फक्त
प्रत्यक्षातलं मिलन नाही
पण स्पर्श कुठेतरी भासतोच ना
सुगंधाचे दरवळ उडून गेल्यावर
आठवणींची जिर्ण पानं मागे दिसतात
नभ व्याकूळलेलं राहतं तरी
भासाचे सांजरंग आकर्षक वाटतात
भरलेली ओंजळ कदाचित भरलेलीच राहिल
दानाचं पुण्य नाही लाभावं तिला
कधीकाळी त्यात चुकून पडलेल्या बीजांचं
आता आनंदाचं झाड व्हावं ही इच्छा...!

