Showing posts with label सिनेमा. Show all posts
Showing posts with label सिनेमा. Show all posts

Tuesday, May 5, 2020

इरफान... बिट्वीन दी लाईन्स!

आज आम्ही 'बुकशेल्फ'वर नवी मालिका सुरू केली. - 'पुस्तकातून पडद्यावर'! आम्ही त्यात पुस्तक आणि सिनेमा यांसंबंधीचे व्हिडीअो प्रसिद्ध करणार आहोत. आम्ही त्या मालिकेचा पहिला भाग इरफान खानला समर्पित केला. त्याच्या सिनेमांचा पुस्तकांशी ठळक संबंध आहे. नेमसेक, मकबूल, स्लमडॉग... यादी तशी मोठी आहे.

मालिकेतला पहिला भाग तयार करायचा होता. फुटेज लागणार होतं. इरफानचे पंधरा एक सिनेमे डाऊनलोड केले. त्याचा 'दी नेमसेक' पाहायचा राहून गेला होता. तो पाहिला. एडिट करताना सिनेमे पाहिले. मग एडिट बाजूला ठेऊन पाहिले. पहाटेपर्यंत... पुस्तकांवरच्या सिनेमांमध्ये बऱ्याच गोष्टी वेळेअभावी दिग्दर्शकाला दाखवता येत नाहीत. पण त्याला पुस्तकातला Between the lines चा भाग पडद्यावर चितारता येत असतो. 'दी नेमसेक' पाहताना इरफान एअरपोर्टवर तब्बूचा दूरून निरोप घेतो असं एक दृश्य आहे. इरफानने खूप सहज केलंय ते! खूऽप म्हणजे खूऽऽपच सहज केलंय! इतकं सहज-साधं काहीतरी घेऊन येण्यासाठी आतल्या आत किती झगडावं लागलं असेल! इरफानची ती लहानशी हरकत पाहताना जीव छातीत असा दाटून येतो. शब्दांच्या अधलं-मधलं जे काही असतं ना ते हेच असावं! मोहात पडलो त्याच्या! ते दृश्य 'बुकशेल्फ'वर इरफानचा व्हिडीअो तयार करताना ठेवलंय मी त्यात. त्याला अर्थ देण्याचा लहानसा प्रयत्न करत...

इरफानचे डायलॉग कमाल असायचे! कधी त्याच्या सहजतेमुळे, कधी त्यातल्या गर्भीत-गंभीर अर्थामुळे. पण मला इरफान सर्वात जास्त आवडतो, तो त्याच्या दोन डायलॉगच्या मधल्या जागेत... एक वाक्य उच्चारल्यानंतर दुसऱ्या वाक्याकडे वळायच्या आधी त्याची नजर, कपाळावरच्या रेषा, ओठांची निःशब्द हालचाल हे असं सगळं मिळून तो काहीतरी करतो. आतमध्ये ढवळणारं, फुलणारं, खदखदणारं सगळं त्याच्या त्वचेतून पाझरत बाहेर येतं. 'मकबूल'मध्ये इरफान बोलला कुठे? तो सगळा सिनेमा त्याच्या आत चाललेल्या घुसळणीचा होता. त्याउलट 'पान सिंग तोमर'मध्ये त्याच्या वाट्याला कितीतरी संवाद आलेत, पण त्या आडून परिस्थितीच्या रगाड्यात अडकून-पिचून गेलेलं त्याचं स्वप्नं सतत डोकावतं. संवादांना स्पर्श न करता आतली खळबळ, आनंद, खट्याळपणा, द्वंद्व... सगळं मांडता यायचं त्याला. साहित्यात 'बिट्वीन दी लाईन्स' ही वाचकासाठीची जागा असते. सिनेमात तसं प्रेक्षकासाठी 'बिट्वीन दी फ्रेम्स' असावं. इरफान प्रेक्षकासाठी त्या जागा तयार करायचा. प्रेक्षकालाही त्या कळायच्या. त्या कळण्या-उमजण्याच्या घडामोडीत तो अभिनेता आपलासा होऊन जायचा. इरफाननं मनात घर केलं ते अशा लहान लहान जागांनी. आता तो नाही तर ते घर अंगावर येतं...

'दी नेमसेक'मधला, दूर चाललेला, सहजपणे रांगेमध्ये उभा असलेला, अगदी अलगद निरोप घेणारा तो इरफान अजूनही डोक्यातून जात नाही...

इरफान... बिट्वीन दी लाईन्स!


Thursday, April 30, 2020

अरे भय्याऽऽऽ

१९९४.
तेव्हा चौथीत होतो. दूरदर्शनवर 'चंद्रकांता' मालिका सुरु झाली होती. इरफान खानला पहिल्यांदा त्या छोट्या पडद्यावर पाहिलं. त्याने बद्रीनाथ-सोमनाथ असा एक डबल रोल केला होता. त्या पात्राच्या अंगावर छोटे चमकदार गोळे लटकवलेले असायचे. तो त्यातला एकेक तोडून फेकायचा आणि ते बॉम्बसारखे फुटायचे. अंगावर लटकलेले बॉम्ब! मला भारी फॅसिनेशन झालं होतं त्याचं.
तो इरफान डोक्यात कुठेतरी नोंदला गेला!
आठ वर्षांनंतर माटुंग्याच्या स्टारसिटी थेटरमध्ये 'कसूर' बघत होतो. तेव्हा इरफान कोर्ट सीनमध्ये समोर आला. पब्लिक प्रॉसिक्यूटर. करारी नजर आणि कॉन्फीडन्ट! हा चंद्रकांतामधला गोळेवाला. मी अोळखलं...
त्यानंतर तो दिसला 'आन - मेन अॅट वर्क' या चित्रपटात! त्यानं तारवटलेल्या-मोठ्या डोळ्यांचा, थंड डोक्याचा, खूनशी खलनायक ताकदीनं उभा केला होता. इरफान खऱ्या अर्थाने भेटला तो इथे! खऱ्या अर्थाने यासाठी की त्यानंतर तो कधीच विस्मृतीत गेला नाही.
इरफानचे डोळे कायच्या काय जखडून ठेवायचे! त्याला शब्दबंबाळ संवादांची गरज कधीच नव्हती. क्रौर्य, विषाद, आनंद, लोभ, मनातला गुंता असं कितीसं सारं त्यानं त्याच्या एकटक पाहण्यातून व्यक्त केलं. त्यानं जेवढा टोकाचा विखार व्यक्त केला असेल तेवढीच सालस आणि इनोसन्ट व्यक्तीरेखाही रंगवली.
इरफानचा अभिनय त्याच्यापासून वेगळं काढता येणं शक्य व्हायचं नाही. तो अमूक अमूक पद्धतीचं पात्रं रंगवतोय हे ठासून सांगण्याची गरज नसायची. तो सहज पडद्यावर यायचा आणि केवळ त्या पात्रासारखा 'असायचा'! त्याचं तसं असणंच पुरेसं व्हायचं. म्हणूनच त्याला कधी 'पिक्चरमधली एन्ट्री' किंवा त्यासाठी बडवलेलं स्पेशल संगीत वगैरे असं लागलं नाही.
कुठल्याशा कार्यक्रमात शाहरुख म्हणाला होता. आम्ही अॅक्टींग करायची म्हणून ही एवढी मेहनत करत, गळे ताणत संवाद म्हणतो आणि हा इरफान येतो. काही वेगळं न करता नुसते संवाद म्हणतो आणि लोक याची तारीफ करतात. खरंय! तो सहज होता! त्याला हवं तेव्हा गूढ असणं, लोभस हसणं, नितळ वागणं सारं सहज साध्य होतं.
आज तो गेला! लोकं म्हणतात विश्वास बसत नाही अजून. लोकांना नसते ना सवय एवढ्या खरेपणाची! मुलामा दिलेलं, वर्खाखाली झाकलेलं, उसनं अवसानं घेतलेलं काहीतरी पाहण्यात जन्म निघून चाललेला असतो. मग 'अरे भय्याऽऽऽ!' असा पडद्यावरुन आवाज येतो. आणि हळुहळू त्याच्या शेजारी उभी राहणारी मोठी नावं सपक वाटू लागतात.
मान वर करुन पाहावीत अशी माणसं आधीच कमी असतात. म्हणूनच तो गेल्यानंतर रितं रितं वाटतंय. कुठंतरी जोडलेला धागा तुटून आत काहीतरी अधांतरी लोंबकळत राहावं असं...
वय वर्ष त्रेपन्न! आताशी तर बैठक बसत होती. अर्ध्यात मोडली!
थोड्या वेळापूर्वी बातमी वाचली. इरफान खान यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. जे काही अस्तित्व उरलं होतं, तेही लोप पावलं.
आता उरलाय तो 'लाईफ इन मेट्रो'मधला बडबड्या मॉन्टी,
'पिकू'तला स्टेरिंगमागे बसलेला राणा
'कारवाँ'मधला साधासुधा शौकत
'करीब करीब...' मधला 'घनघोर इश्क' म्हणणारा योगी
'नेमसेक'मधला अशोक
'लाईफ अॉफ पाय'मधला पाय पटेल
साजन फर्नांडीस,
पान सिंग तोमर,
अश्वीन कुमार,
चंपक बन्सल...
आणि इरफानचा तो आवाज
'अरे भय्याऽऽऽ'!


Sunday, April 26, 2020

मर्यादीत अवकाशात फुलणारा सिनेमा

लॉक रुम मिस्ट्री’ हा कथाप्रकार परदेशी साहित्यात मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे. आपल्याकडे तो फार विचारात घेतला नसला तरी आपल्याला त्याची ठेवण माहीत आहे. एका बंदिस्त, मर्यादीत जागेत घडणारा (बहुतांशत:) थरारक आणि रहस्यमय असा घटनाप्रसंग, ही त्या कथाप्रकाराची साधारण ओळख सांगता येईल. पण हा घटक सिनेमासारख्या अमर्याद समजल्या जाणाऱ्या माध्यमात वापरला गेला आणि अनेक उत्तम सिनेमांची निर्मिती झाली. कॅमेऱ्याला आणि पर्यायाने लेखक-दिग्दर्शक-अभिनेते-इतर कलाकार-तंत्रज्ञ अशा सर्वांवर आलेले ते जागेचे बंधन त्यांच्या कलात्मकतेला आणि सर्जनशिलतेला धुमारे फुटण्यास कारणीभूत ठरले. अशा पद्धतीच्या काही उत्तम पण आगळ्या वेगळ्या सिनेमांवर टाकलेली एक नजर…

-------------

‘लॉक रुम मिस्ट्री’ हा कथाप्रकार परदेशी साहित्यात मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे. आपल्याकडे तो फार विचारात घेतला नसला तरी आपल्याला त्याची ठेवण माहीत आहे. एका बंदिस्त, मर्यादीत जागेत घडणारा (बहुतांशत:) थरारक आणि रहस्यमय असा घटनाप्रसंग, ही त्या कथाप्रकाराची साधारण ओळख सांगता येईल. पण हा घटक सिनेमासारख्या अमर्याद समजल्या जाणाऱ्या माध्यमात वापरला गेला आणि अनेक उत्तम सिनेमांची निर्मिती झाली. कॅमेऱ्याला आणि पर्यायाने लेखक-दिग्दर्शक-अभिनेते-इतर कलाकार-तंत्रज्ञ अशा सर्वांवर आलेले ते जागेचे बंधन त्यांच्या कलात्मकतेला आणि सर्जनशिलतेला धुमारे फुटण्यास कारणीभूत ठरले. अशा पद्धतीच्या काही उत्तम पण आगळ्या वेगळ्या सिनेमांवर टाकलेली एक नजर…
एक प्रतिष्ठीत कंपनीत उच्च अधिकारी पदासाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या मुलाखतीचा टप्पा पार पडल्यानंतर अखेरचे आठ उमेदवार लेखी परिक्षेसाठी एका बंदिस्त खोलीत आणले जाते. चार पुरुष - चार महिला. त्या खोलीत सात-आठ टेबल, छताला दिवे, सर्वांच्या हालचालींचं निरीक्षण करण्यासाठी भिंतीवर बसवलेले कॅमेरे, भिंतीवर मोठा स्क्रीन, त्याखाली परिक्षेसाठी बसवलेला डिजिटल टायमर. एक अधिकारीवजा व्यक्ती परक्षेचे नियम समजावून जाते. परिक्षा एकूण ऐंशी मिनिटांची. त्या काळात कुणी खोलीबाहेर जाऊ शकत नाही, कुणी आत येऊ शकत नाही. सर्वांवर नजर ठेवायला एक बंदुकधारी गार्ड उभा आहे. त्याच्याशी बोलणारी किंवा उत्तरपत्रिकेचा कागद खराब करणारी व्यक्ती परिक्षेतून बाद होईल. केवळ योग्य उत्तर देणारी व्यक्ती पदासाठी निवडली जाईल. उमेदवारांना केवळ एकाच प्रश्नाचे बिनचूक उत्तर लिहायचे आहे. प्रश्नपत्रिका वाटली जाते आणि सगळेच भांबावून जातात. तो कागद चक्क कोरा असतो! परिक्षा सुरू होते ती ‘प्रश्न काय?’ याच प्रश्नाने!
स्टुअर्ट हॅझलडीन याने दिग्दर्शीत केलेला ‘एक्झाम’ (२००९) हा सिनेमा थ्रिलर आणि सस्पेन्स सिनेमाचे उत्तम उदाहरण आहे. पूर्ण सिनेमा एका खोलीत घडतो. इथल्या कॅमेऱ्याला जागेचे असलेले बंधन हेच त्या सिनेमाचे शक्तिस्थान आहे. एकूण १०१ मिनिटांच्या या सिनेमात सर्व व्यक्तीरेखा, त्यांचा वंश, पात्रता, गुणवत्ता यांसोबत परिक्षेची ती खोली आणि ‘तिचे’ व्यक्तीमत्त्व अशा विविध गोष्टींचा सूक्ष्मपणे विचार करत ‘एक्झाम’ उलगडत जातो. ‘एक्झाम’मध्ये दुहेरी शोध आहे. एक - प्रश्न काय? आणि मग - त्याचे उत्तर काय? त्यासाठी उमेदवारांना आधी परस्परांकडे आणि मग त्या खोलीकडे बारकाईने पाहावे लागते. त्यांचे ते पाहणे हीच त्या सिनेमाची कथा आहे. साधी लेखी स्पर्धा जीवघेणी कशी होऊ शकेल याचे तणावपूर्ण चित्रण ‘एक्झाम’ करतो.
एकाच जागेत घडणाऱ्या सिनेमांची सुरूवात कदाचित आल्फ्रेड हिचकॉक या रहस्यपटांसाठी नावाजलेल्या दिग्दर्शकाने केली असावी. त्याने १९४४ साली तयार केलेला ‘लाईफबोट’ हा सिनेमा पूर्णपणे समुद्रात असलेल्या एका लहान बोटीत घडतो. (हिचकॉक त्याच्या प्रत्येक चित्रपटात स्वत:ची एक झलक दाखवण्याबद्दल प्रसिद्ध होता. मात्र बोटीवर घडणाऱ्या सिनेमात ते कसे शक्य होईल? असा प्रश्न पडला. मग हिचकॉकने बोटीतल्या एका वर्तमानपत्रात लठ्ठपणा कमी करण्याच्या जाहिरातीत स्वत:चा फोटो टाकला होता.) हिचकॉकने चार वर्षांनंतर तयार केलेला ‘रोप’ हा ‘मर्डर मिस्ट्री’ सिनेमादेखील पूर्णपणे एका घरात सुरु असलेल्या पार्टीच्या दरम्यान घडतो. पुढच्याच दशकात सिडनी लुमेट याने ‘१२ अँग्री मेन’ हा ज्युरी रुममध्ये घडणारा, माणसाच्या सारासार विचारसरणीवर भाष्य करणारा उत्तम सिनेमा तयार केला. त्याच्या तीस वर्षांनंतर बासू चॅटर्जीनी त्याच सिनेमाचा ‘एक रुका हुआ फैसला’ या नावाने चांगला रिमेक तयार केला.
सिनेमा एका जागेत घडत असला तर तो एकसुरी होण्याची मोठी भिती असते. तसेच कॅमेरा सतत व्यक्तीरेखांच्या जवळ राहत असल्याने दिग्दर्शक आणि कलाकार यांची जबाबदारीदेखील वाढते. आणि अनेक दिग्दर्शकांनी ती जबाबदारी उत्तमरित्या पेलली. ‘फरमेट्स रुम’ (२००७) हा स्पॅनिश थ्रिलरसुद्धा एका बंदिस्त जागेतच घडतो. मात्र इथली भिती आणि रहस्य वेगळं आहे. चार गणिततज्ञांना एका रुममध्ये आमंत्रित करुन बंद केले जाते. त्यांना मोबाईलवरुन वेगवेगळी कोडी घातली जातात. त्याचे उत्तर मोबाईलवरुनच द्यायचे आहे. प्रत्येक कोडे आल्यानंतर ठराविक वेळेत खोलीच्या भिंती आतल्या दिशेने आकुंचन पावू लागतात. आतल्या चौघांना जीव वाचवण्यासाठी वेळेत कोड्याची उकल करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे का आणले आहे याचा शोधही घ्यायचा आहे.
बंद जागेत सिनेमा बनवणाऱ्या दिग्दर्शकांनी ती मर्यादा वेगवेगळ्या तऱ्हेने हाताळून पाहिली आहे. ‘स्नोपिअर्सर’ (२०१३) हा उत्तम सायन्स फिक्शन सिनेमा भविष्यात पर्यावरणाने समतोल ढासळलेल्या जगात एका धावत्या ट्रेनमध्ये घडतो. अशी ट्रेन जी सबंध पृथ्वीला न थांबता फेऱ्या मारत आहे. बाँग-जून-हो या साऊथ कोरीयन दिग्दर्शकाने (२०२० च्या अॉस्करविजेत्या ‘पॅरासाईट’ सिनेमाचा दिग्दर्शक) ट्रेनच्या अवकाशात समस्त मानवी समाजातील उतरंड, माणसाच्या मनातले काळे कोपरे आणि जिवंत राहण्यासाठी हिंसा करण्याची आदिम भावना यांचं प्रत्ययकारी दर्शन घडवलं आहे. योगायोग म्हणजे हे मुद्दे ‘पॅरेसाईट’ या सिनेमातही दिसून येतात. विन्सेन्झो नतालीचा ‘क्यूब’ (१९९७) हा सिनेमा एका मोठ्या आकाराच्या, प्रत्येक बाजूला एक दरवाजा असलेल्या क्यूबमध्ये घडतो. त्यातले मुख्य पात्र त्या क्यूबमध्ये बंदिस्त आहे. (या सिनेमाची ‘क्यूब २’ आणि ‘क्यूब ३’ अशी ट्रिलॉजी आहे.) ‘दी शॅलोज’ हा २०१६ सालचा जबरदस्त थ्रिलर सिनेमा समुद्रकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला खडक, त्या खडकावर शार्कच्या हल्ल्याने जखमी होऊन अडकलेली एक तरुणी आणि तिच्याभोवती चकरा मारणारा भुकेला शार्क अशा अवकाशात घडतो. माईक फ्लॅनागन या दिग्दर्शकाने ‘आॅक्युलस’ हा उत्तम भयपट तयार करण्यापूर्वी त्याच नावाची ३२ मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार केली होती. एका आरशामध्ये अमानवी शक्ती असल्याची खात्री असलेला एक तरुण ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी एका बंदिस्त खोलीत तो आरसा आणि कॅमेरे घेऊन सज्ज होतो आणि त्या खोलीत आकाराला येतं एक विलक्षण नाट्य! ती फिल्म ‘OCULUS Chapter 3 - The Man with the Plan Short 2006’ या नावाने युट्यूबवर उपलब्ध आहे.  ‘बॅलन्स’ ही साडेसात मिनिटांची क्ले अॅनिमेशन शॉर्ट फिल्मदेखील याच कारणासाठी पाहायला हवी. अधांतरी तरंगणाऱ्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर उभी असलेली पाच माणसं. त्यांना सापडणारी एक ट्रंक आणि त्यामुळे त्यांच्या वागण्यात होणारा बदल अशी कथावस्तू असलेल्या या सिनेमाने १९८९ सालचा सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा अॉस्कर पुरस्कार मिळवला होता. ती फिल्मदेखील युट्यूबवर पाहता येते.
मात्र मर्यादीत अवकाशांच्या बाबतीत सर्वात मोठे आव्हान पेलले ते रॉड्रीगो कोर्टेस हा स्पॅनिश दिग्दर्शकाने. त्याने २०१० साली बनवलेला ‘ब्युरीड’ हा सिनेमा एका सहा बाय तीन आकाराच्या कॉफीनएवढ्या छोट्या जागेत घडतो. एका जिवंत माणसाला लाकडाच्या कॉफीनमध्ये टाकून जमिनीत पुरण्यात आले आहे. त्याच्या शेजारी एक सिगारेट लायटर आणि थोडी बॅटरी असलेला मोबाईल आहे. कॉफीनमध्ये श्वास घेण्यासाठी पुरेसा प्राणवायूदेखील नाही. त्याच्याकडे जिवंत राहण्यासाठी थोडाच काळ उरला आहे आणी आपण कुठे आहोत हेदेखील त्याला ठाऊक नाही. या सिनेमामध्ये कॉफीनच्या बाहेरचे एकही दृश्य नाही, मात्र तरीसुद्धा तो सिनेमा उत्तम तणावपूर्ण अनुभव देतो. त्या व्यतिरिक्त माईक फ्लॅनागनचा ‘हश’ (२०१६), स्टीफन किंगने लिहिलेला आणि फ्रँक डॅराबॉन्टने दिग्दर्शीत केलेला, एका सुपरमार्केटमध्ये घडणारा ‘द मिस्ट’ (२००७), बहुतांशत: विमानात घडणारे ‘फ्लाईटप्लॅन’, ‘नॉन-स्टॉप’, ‘रेड आय’, हे सिनेमे, जॉन डॉवडल दिग्दर्शीत आणि नाईट श्यामलनने लिहिलेला ‘डेव्हील’ किंवा स्टीग स्वेंडसनचा ‘एलिव्हेटर’ हे लिफ्टमध्ये घडणारे सिनेमे, टेरेन्टीनोचा वेअरहाऊसमध्ये घडणारा ‘रिझरव्हॉयर डॉग्स’, ‘दी ग्लास कॉफीन’ हा लिमोझीन गाडीमध्ये घडणारा सिनेमा, किंवा ‘द किलिंग रुम’, ‘सॉ’ (आणि त्याचे इतर काही भाग), ‘इनह्युमन रिसोर्स’, ‘सर्कल’, ‘दी अॉटॉप्सी अॉफ जॉन डोव्ह’, ‘इन्फिनिटी चेंबर’, ‘दी मेथड’, ‘अननोन’, रिचर्ड लिंकलेटरचा ‘टेप’ असे एका खोलीत घडणारे सिनेमे अशी मोठी नामावळी सांगता येते.
अगदी खऱ्या अर्थाने बंदिस्त अशा नाही, मात्र मर्यादीत जागेत घडणाऱ्या उत्तम सिनेमांमध्ये ‘रिअर विंडो’ (१९५४) या आल्फ्रेड हिचकॉकच्या आणखी एका सिनेमाचे नाव सांगता येईल. खरे तर तो सिनेमा एका मोठ्या इमारतीत घडतो. आपल्याला सिनेमा दिसतो तो एका पायाने जखमी झालेल्या फोटोग्राफच्या दृष्टीकोनातून. अपघातात पाय दुखावलेला जेफ घराबाहेर पडू शकत नाही. त्यामुळे घराच्या खिडकीतून दिसणारी इतर बिऱ्हाडे पाहणे हा त्याचा उद्योग होऊन जातो. मात्र त्या निरीक्षणामध्ये त्याला कुठेतरी खुनाचा कट दिसू लागतो. तो त्याच्या प्रेयसीच्या मदतीने त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करतो. हिचकॉकचा कॅमेरा मुख्य पात्राच्या दृष्टीकोनाशी एवढा प्रामाणिक आहे की तो कधीच खिडकी सोडून बाहेर जात नाही. एक माणूस घरातून जेवढे दृश्य पाहू शकेल तेवढच्याच गोष्टी दाखवून हिचकॉक रहस्यपूर्ण आणि थरारक कथा उलगडत नेतो. डंकन जोन्सचा ‘मून’ (२००९) किंवा पिटर वेअरचा जिम कॅरी अभिनित ‘दी ट्रूमन शो’ हे सिनेमे काहीसे लौकीक अर्थाने मर्यादीत जागेत घडतात, मात्र आशयाच्या पातळीवर त्यातली मुख्य पात्रं एका वेगळ्या अवकाशात अडकलेली आहेत. विशेष करुन ‘दी ट्रूमन शो’ हा सिनेमा! तो तर तत्वज्ञानाच्या पातळीवर अधिक पुढे जातो.
सिनेमा हे माध्यम अमर्याद आहे. असे म्हणतात की, जे जे विचार करता येईल ते ते पडद्यावर दाखवता येणे शक्य आहे. अशा स्थितीत जाणिवपूर्वक मर्यादा घालून त्या परिघामध्ये थरार, रहस्य, नाट्य, भय, मानवी वर्तन अशा विविध गोष्टी हाताळणारे, गोष्ट सांगण्याची वेगळी वाट स्वीकारणारे हे उत्तम सिनेमे निर्माण झाले. एकीकडे ‘अवतार’, ‘क्लाऊड अॅटलस’, किंवा आपल्याकडचा ‘तानाजी’ असे सिनेमे पडद्यावर भव्यदिव्य चित्र निर्माण करतात. आणि दुसरीकडे कथेला जागेची अट घालत हे सिनेमे मर्यादीत अवकाशात तेवढाच मोठा आणि उत्कट परिणाम निर्माण करत फुलू लागतात. सिनेमा या माध्यमाची हीच तर मौज आहे.

(दैनिक 'दिव्य मराठी', रसिक पुरवणी, २६ एप्रिल २०२०) 

Wednesday, January 4, 2012

The Scent Short Film



मी आणि माझ्या मित्रांनी केलेली ही छोटीशी फिल्‍म. हा आमचा प्रोजेक्‍ट होता. आम्‍हाला काही प्रॉप्‍स दिले गेले आणि त्‍यावर पंधरा मिनीटांत संवादांशिवाय स्‍टोरी तयार करून चित्रित करण्‍याचं काम सोपवण्‍यात आलं होतं. त्‍यातून घडलं ते हे...

Monday, February 7, 2011

‘अवतार’ - उद्याच्या तंत्रबंबाळ चित्रपटसृष्टीची नांदी!

अवतार चित्रपटातील नावी जमात



        2009 मधे डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला टीव्हीवर ‘अवतार’चे प्रोमोज येऊ लागले होते. ती विचित्र माणसं, त्यातले वेगळे प्राणी हे सगळं पाहून हा फार जुन्या कालखंडात घडणारा चित्रपट असावा असा समज झाला. चित्रपट पहाण्याची आवड आणि कॅमरूनचं नाव यामुळे इतरांप्रमाणे मीदेखील चित्रपट पहायला गेलो. प्रत्यक्षात ती निघाली सायन्स फिक्शन फिल्म.
        पाहताक्षणी मला चित्रपट खूप आवडला. पृथ्वीवर खनिजांच्या जाणवत असलेल्या कमतरतेमुळे माणसं पँडोरा नावाच्या एका ग्रहावर खनिजांच्या शोधार्थ जातातं. तिथं नावी नावाची मानवसदृष्य जमात वास्तव्यास असते. ही खनिजं प्राप्त करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून नावींशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी त्यांच्यापैकी एकास नावींकडे पाठवण्यात येते. त्यानं मैत्री करून आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अपेक्षीत असतं. पण घडतं उलट. नावींचं आयुष्य जाणून घेताना तो माणूस त्यांच्याशी एकरूप होत जातो. अखेरीस झालेल्या नावी विरूद्ध मानव अशा युद्धात नावींच्या बाजूनं उभा ठाकतो. निसर्गापासून दिवसेंदिवस दूर जात असलेला माणसाचा पुन्हा निसर्गाकडे होणारा प्रवास इथं दिसतो. असो; चित्रपटाचं परिक्षण लिहीण्याचा इथं उद्देश नाही.
        निसर्ग आणि मानवावर आधारलेली चित्रपटाची ही संकल्पना आवडण्यासारखी होतीच, पण त्याचबरोबर चित्रपटातले ग्राफिक्सही तितकेच प्रभावी होते. नावी जमातीचं शरिर हे जवळपास आठ ते दहा फूट उंच होतं. त्वचेचा निळा रंग, लांब कान, शेपटी, मोठाले डोळे, रूंद नाक, मांजरासारखी बुबुळं अशी त्या शरिराची इतर वैशिष्ट्यं होती. हे झालं केवळ त्यांच्या शरिराचं वर्णन. पँडोरा ग्रहावरचा निसर्ग, आश्चर्यकारक आकाराची झाडं, ड्रॅगनसारखे प्राणी, नावींच्या राहण्याचं ठिकाण असं सगळंच विशेष तांत्रिक मेहनतीनं तयार केलं होतं. तो निसर्ग वेगळा आहे हे दाखवणं क्रमप्राप्त होतं, त्यामुळे ही सगळी वैशिष्ट्यं बऱ्याच प्रमाणात मनाला पटतात. चित्रपट पाहिल्यानंतर हा निसर्ग, कसा तयार करण्यात आला असेल? याचं चित्रीकरण पृथ्वीवरच्या कोणत्या भागात करण्यात आलंय? त्या नावी जमातीचा मेकअप नक्की कसा केलाय? हे काही केल्या मला कळेना. अखेर हे सगळं फार चांगल्या पद्धतीनं तयार केलंय, असं ढोबळ विधान मनात ठेऊन मी गप्प बसलो.
        माझा लहान भाऊ सूरज अ‍ॅनिमेशन आणि स्पेशल इफेक्टचा कोर्स करतोय. त्यानं हा चित्रपट पाहिला. त्याच्या शिक्षणाच्या जवळची गोष्ट म्हणून तो त्यातल्या खाचाखोचा शोधू लागला. एक दिवस आम्ही बोलत असताना अवतारचा विषय निघाला. तेव्हा मी पँडोराचा निसर्ग दाखवण्यासाठी कॅमरूनने ज्या जागांची निवड केली त्या छान आणि वेगळ्या होत्या असं म्हटलं. त्यावर सूरज म्हणाला, ‘‘दादा, तो सगळा चित्रपट स्टुडीओच्या आत शूट झालाय.’’ आता हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता. माझा विश्वास बसत नाही म्हणून सूरजने मला अवतारची मेकींग ऑफ दाखवली. मी पाहिलेले (नावी जमातीच्या रूपातील) कलाकार प्रत्यक्षात चेहºयाने वेगळेच होते. त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रूग्णालयात शरिराला लावतात तशा लहान लहान वायर जोडल्या होत्या. ‘‘यांच्या माध्यमातून त्या कलाकराच्या केवळ हालचाली रेकॉर्ड केल्या जातात. याला मोशन कॅप्चरींग म्हणतात.’’ सूरज माहिती पुरवत होता. ‘‘यामध्ये अ‍ॅनिमेशनचाही भाग असतो. या मोशन्स त्या कलाकारासाठी तयार करण्यात आलेल्या एका ग्राफिकल मॉडेलमध्ये टाकल्या जातात. मग ते मॉडेल थेट त्या कलाकाराप्रमाणे हालचाली करू लागतं. त्या मॉडेलवर इतर संस्कार करून त्याला एक चेहरा दिला जातो. अवतारमधली सगळी नावी जमात अशीच तयार झालीय.’’ मोशन कॅप्चरींग, कम्पोझीटींग, मॅच मूव्हींग, रोटोस्कोपी, लायटींग, मॉडेलिंग. अशा अनेक पद्धतींबद्दल तो बरंच काही सांगत राहिला. मी पहात होतो. चित्रपटातल्या एक दृष्यात ते दोघे उंच झाडाच्या जाडजूड फांद्यांवरून उड्या मारत चाललेले असतात. पण प्रत्यक्षात ते एका स्टुडीओमध्ये तयार केलेल्या लाकडी रस्त्यांवरून उड्या मारत होते. ‘‘हे शूट झाल्यानंतर त्याच्या मागे ती झाडं वगैरे तयार करण्यात आली. त्यातला एवढासाही भाग खरा नाही. सगळं काही बनवण्यात आलंय.’’
         हे सगळं निदान माझ्यासाठी तरी अकल्पित होतं. स्पेशल इफेक्ट काय असतात, हे समजण्यापुरतं जुजबी ज्ञान मला होतं. पण हे काहीतरी अचाटच वाटलं. चित्रपट क्षेत्रात शिरकावं करणारा हा एका नवाच घटक होता. नसलेल्या गोष्टी खऱ्याखुऱ्या आहेत असा विश्वास बसावा इतकं ते सगळं बेमालुम होतं. तसं पहायला गेलं तर स्पेशल इफेक्टस्मध्येही हेच असतं की. मोठमोठे बॉम्बस्फोट, पृथ्वीवर पडणाऱ्या उल्का, एलियन्स अटॅक किंवा सुपरहिरोंचे चित्रपट. या सगळ्यांमध्ये भरगच्च स्पेशल इफेक्टस् असतात. पण ते पहाताना ‘हे स्पेशल इफेक्ट आहेत’ हे माहित असतं. तसं इथं घडलं नाही. पडद्यावर दिसणारं सगळं खरं आहे असं मनानं चटकन मान्य केलं होतं. हे थोडं गंभीर वाटलं.
        मी पाहिलेल्या काही सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये भविष्यातील जगात येऊ शकणाऱ्या कृत्रिमतेचे चित्रण पहिले आहे. अवतारनं निर्माण केलेल्या त्या जगातून मला ही कृत्रिमता चित्रपट क्षेत्रापुरती का होईना, पण येऊ घातल्याचा भास झाला. एकेकाळी चित्रपट केवळ स्टुडिओमध्ये चित्रीत केला जात असे. बाजार, बगिचे, रस्ते वगैरेंचे सेट उभारून चित्रीकरण पार पडत असे. त्यानंतर चित्रपट स्टुडिओबाहेर बाहेर आला. चित्रपटाला वास्तवाचा जास्तीत जास्त स्पर्श व्हावा या हेतूनं (मग ते केवळ चित्रीकरणाच्या पातळीवर का असेना) चित्रपटकर्त्यांकडून प्रयत्न होऊ लागला. मात्र गेल्या दशकभराच्या काळामध्ये चित्रपट अधिकाधिक वास्तव (केवळ प्रसंगांच्या बाबतीत हा!) करण्याच्या नादात कृत्रिमतेचा आधार घेण्याकडे कल वाढू लागला आहे. याचा परिणाम म्हणजे आता तयार केले जाणारे चित्रपट हे तंत्रबंबाळ होऊ लागले आहेत. चित्रपटाची कथा आणि पर्यायाने तिचा परिणामही तंत्राच्या भडीमारात गुदमरू लागलाय.
        सूरज नेहमीच माझ्याशी इफेक्ट, ते तयार करण्याची पद्धत, अमुक एका चित्रपटात केलेलं मॉडेलिंग, नवीन आलेले थ्री-डी चित्रपट वगैरेंवर गप्पा मारत रहातो. त्याच्या सहवासाने मलाही त्यातल्या बाबींची माहिती होऊ लागली आहे. त्याच्या क्लासमधली मुलं घरी येत असतात. त्यांच्या गप्पा कानावर पडतात. ही सगळी मुलं त्या तंत्रानं भारून गेल्यासारखी वाटतात. आता तो त्यांच्या शिकण्याचा भाग आहे म्हणून त्याच्याशी जवळीक साधणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. पण त्यांच्या बोलण्यामध्ये तंत्रानंतर कोणतेच विषय नसतात. ही झाली त्या क्षेत्राशी संबंधीत असलेली माणसं. इतरांचं त्याहून वेगळं नाही. हे तंत्र आता सगळ्यांनाच आवडू लागलंय. थ्रीडी किंवा इतर स्पेशल इफेक्टस् हे आजच्या प्रेक्षकाला आकर्षित करण्याचं काम करतायत. या नवनव्या तंत्रासाठी चित्रपट पाहिले जातायत. पण चित्रपटांसाठी ही चिंतेची बाब आहे.
        चित्रपट माध्यम हे स्वत:च एक तंत्र असल्यामुळे त्यात तांत्रिक अंगानं बदल होणारच. पण यानंतरही तो चित्रपट आहे याचा विसर पडू न देणं महत्त्वाचं ठरतं. त्यातल्या चित्रांमधून मांडली जाणारी कथा, तिचा आशय, दिग्दर्शक-लेखक आणि तंत्रंज्ञांचादेखील दृष्टीकोन, त्यातून चर्चील्या जाणाऱ्या गोष्टी हे सगळंच चित्रपटाला परिपूर्ण करत जातं. त्यातली दृष्यभाषा तर फार महत्त्वाची. ही भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी, एखादा आवश्यक परिणाम साधण्यासाठी तंत्राचा वापर नक्की करण्यात यावा. पण घडतंय उलटं. आज चित्रपट अर्थपूर्ण नव्हे तर देखणे, थरारक, रोमांचक अन् लोकप्रिय करण्यासाठी या तंत्रांचा वापर केला जात आहे. वापर नव्हे भडिमार केला जातोय. त्यामुळे तंत्रज्ञान हे काहीतरी घडवण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट न रहाता चित्रपटाची कथा, आशय, इत्यादींच्या रांगेत जाऊन बसलंय. प्रेक्षकांचाही तोच समज झालाय. आज अवतारचे इफेक्टस्, टॉय स्टोरी-आईस एजमधील थ्रीडी टेक्नॉलॉजी, या अ‍ॅनिमेशनपटांतील मॉडेल यांची चर्चा होते. अर्थात ती व्हावी. त्या गैर काहीच नाही. पण त्याबरोबरीने आशय आणि अर्थपातळीवर मूल्यात्मकता या संबंधानेही चित्रपटाचा विचार होणे आवश्यक ठरते. ती घडताना कुठेच दिसत नाही. म्हणजे अवतारच्या इफेक्टबद्दल बोलणारी अनेक माणसं मी प्रत्यक्षात आणि माध्यमांमध्येही पाहिली. मात्र कोणत्याही ठिकाणी त्या चित्रपटाची मूळ संकल्पना चर्चीली गेलेली मला आढळली नाही.
        चित्रपट आणि पर्यायानं प्रेक्षकांवर होणाऱ्या तंत्राच्या भडीमारात चित्रपटातले कलागुण, त्यातून मांडला जाणारा आशय या महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टी दुय्यम स्थानावर ढकलल्या जात आहेत. बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड, कोणत्याही प्रदेशातील चित्रपट पहा. हे सगळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाटतात. हॉलिवूडमध्ये केला जाणारा तंत्राचा वापर तर विस्मयचकित करणारा आहे. त्या तुलनेत भारतीय चित्रपटांमध्ये तंत्राचा त्या सफाईने वापर केला जात नसला तरीही हे सगळे चित्रपट अत्यंत चकचकीत असतात. रजनिकांतचा रोबोट, लव्ह स्टोरी 2050, क्रिश, यांसारख्या कित्येक चित्रपटांसाठी परदेशातून तंत्रज्ञ मागवण्यात आलेले आपण पाहिले. या गोष्टींची बेसुमार चर्चा वर्तमानपत्रं, वाहिन्या, मुख्यत्वेकरून चित्रपटांशी संबंधीत वाहिन्यांवर केली जाते. चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या तंत्रांचा गवगवा होतो, मात्र चित्रपटांमधून काय दिलं जातंय हे दुर्लक्षीतच रहातंय. अर्थात ही काही आज घडणारी गोष्ट नाही. अमिताभच्या तारूण्यात त्याने केलेले चित्रपटही असेच होते. त्यांचा भर मनोरंजनावर होता. या चित्रपटांतून त्याची इमेज लार्जर दॅन लाईफ झाली आणि कथावस्तू दुय्यम होत गेली. प्रेक्षक त्याला पहायला चित्रपटगृहात यायचे. आज अमिताभची जागा तंत्राने घेतली एवढंच.
        रोबोट या चित्रपटात मांडण्यात आलेली संकल्पना म्हणजे ‘यंत्रमानवाला भावना बहाल केल्या आणि तो तुमच्यावर प्रेम करू लागला तर मग काय?’ या संकल्पनेवर 2001 साली स्टीव्हन स्पीलबर्गने ‘आर्टीफिशल इंटेलिजन्स’ हा चित्रपट तयार केला होता. या संकल्पनेवर चर्चा करण्यास तो बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. हे ‘रोबोट’ संदर्भात घडलं नाही. कारण तो पूर्णपणे मनोरंजनमूल्यांवर आधारित होता. हीच बाब लव्ह स्टोरी 2050 ची. वर्तमानकाळात आपलं प्रेम हरवलेली एक व्यक्ती त्या प्रेमाच्या शोधार्थ भविष्यकाळात जाऊन पोहोचते हा चित्रपटाचा विषय. भविष्यामध्ये जेव्हा तंत्रज्ञानानं प्रचंड प्रगती केलेली असेल, त्याचा मानवावर, त्याच्या जाणिवा आणि भावनांवर तेवढाच मोठा परिणाम होत असेल, अशा काळात त्याच्या प्रेमाच्या व्याख्या कशा असतील? त्याच्या भावना बदललेल्या असतीरल का? तो प्रेमाला कोणत्या पद्धतीनं प्रत्युत्तर देईल? अशा अनेक गोष्टी या चित्रपटात पडताळून पाहता आल्या असत्या. प्रत्यक्षात झालं नेहमीसारखंच. हा चित्रपटही भविष्यातलं भौतिक जग दाखवण्यापुरताच मर्यादीत राहिला. विज्ञानकथेच्या अंगानं जाणारे हे चित्रपट एक फॅन्टसी स्टोरी बनून राहिले. त्यांच्यावर अखेरपर्यंत दिसून आला तो केवळ तंत्राचा प्रभाव. इथं पुढारलेलं तंत्र आणि मागासलेले विचार असं व्यस्त प्रमाण दिसतं.
        तंत्र वापरलं जाऊ नये असं म्हणणं नाही. उलट तंत्राचा वापर करून तयार करण्यात आलेले काही चांगले चित्रपटही उदाहरणादाखल सांगता येतील. 1997 साली आलेला ‘कॉन्टॅक्ट’ हा एलियन्स संपर्कावर आधारित चित्रपट अत्यंत माफक इफेक्टचा वापर करून देव, माणूस अन् श्रद्धा यांवर भाष्य करतो. त्याउलट 2000 साली आलेल्या वाचोस्की बंधूंच्या ‘मेट्रीक्स’ या चित्रपटात अनेक स्पेशल इफेक्टचा भरणा होता. मात्र तो कुठेच चित्रपटावर कुरघोडी करत नव्हता. अवतारमध्येही बऱ्याच प्रमाणात तंत्रामधून आवश्यक परिणाम साधण्यात आला आहे. (पण अवतारची ही तंत्रं एवढी लोभस आणि आकर्षक आहेत की प्रेक्षक चित्रपटाचा अर्थ लावण्यापेक्षा त्यांच्या देखणेपणातच गुंतून पडतो) बदलत्या काळानुसार तंत्र पुढे येणारंच. पण ते चित्रपटाच्या पुढं न जाता त्याच्या बरोबरीनं वापरलं जाणं गरजेचं आहे. अन्यथा सध्या ज्या प्रमाणे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारे थ्रीडीपट केवळ ‘थ्रीडी इफेक्टस्’साठी पाहिले जातात, तसे उद्या बहुतांश चित्रपट हे केवळ त्यांच्यात वापरण्यात आलेल्या मनमोहक तंत्रासाठी पाहिले जातील.