Friday, June 7, 2013

मन

आज सकाळी डोळे उघडले
खूप भडभडून आलं होतं.
पाहिलं तर मन उशीखालून निसटून गेलं होतं कुठेतरी.
मी एक उसासा टाकला
ते हवं तसं भटकत होतं.
एकटंच. कुठल्‍यातरी प्रदेशातून. विवरांतून. अंधारातून. उन्‍हातून.
जिथं मला जायची मनाई होती.
मला क्षणभर हेवा वाटला अन् वाईटही
ते माघारी आलं तेव्‍हा मी समोरच उभा होतो.
ते थबकलं.
मी म्‍हटलं, ''काय हे?''
त्‍यानं काहीच म्‍हटलं नाही. ते कधीच म्‍हणत नाही.
मी थोडा जवळ गेलो.
''असं करून कसं चालेलं. तेही सकाळ सकाळ?''
ते शांत उभं. त्‍याच्‍याकडे उत्‍तर नाही हे ठाऊक होतं मला.
''मी समजून घेऊ शकतो रे तुला, पण हे सारं शक्‍य आहे का?''
ते खिडकीबाहेर आभाळ पाहत राहिलं.
''थोडी जनरित पाहायला नको का''?
ते पुन्‍हा शांत. पण ते गोंधळलेलं असणार.
त्‍याचं काय करावं ते कळेना.
मी त्‍याचा हात धरला आणि म्‍हटलं,
''चल, आपण गुंतू या कुठंतरी!''
ते बिलगलं मला आणि चालू लागलं सोबत.
पाहू आता किती गुंतता येतं ते.

No comments:

Post a Comment