माझी प्रत्येक सकाळ तुझ्या जिव्हाळ्याने भरलेल्या शब्दांनी सुरू होते. मनाला गारवा देणारा अनुभव असतो तो माझ्यासाठी. तुझा मंद-मुलायम आवाज ऐकू येतो तेव्हा तू जवळ भासतेस आणि दूरही. ते छानही वाटतं, किंचित बोचतंही. तू दिसत नाहीस, डोळ्यांपुढे नाहीस, मला तुला त्या पातळीव अनुभवता येत नाही यानं मन दुखावतं-खंतावतं. तू आणि मी कधी कामाचं बोलतो, इकड-तिकडच्या गप्पा करतो, ते अर्थ-बीनअर्थाचं सगळंच बोलणं मला फार हवंहवंसं वाटतं. न बोलता-लिहीता आपल्यामध्ये नांदणारी शांतताही तितकीच हवीहवीशी, आश्वस्त करणारी असते. आजकाल मी बसल्या बसल्या उगाचच माझा हात पुढे करतो. या वेड्या आशेसह की तू चटकन धरशील तो. तुझ्या स्पर्शाची कल्पना करुन मी उगाचच सुखावतो. बोटात बोटं गुंफली जातात, नजरेला नजर मिळते आणि माझा तुझ्याशी संवाद सुरू होतो. अथांग-अमर्याद असा. त्याला काळाचं, परिस्थितीचं, पात्रांचं असं कशाचंच भान नसतं, चौकट नसते. मला तसं तुझ्यासोबत राहायला आवडतं. तू इथे नाहीस, म्हणून मी माझ्या मनाची तशा संवादाच्या आधारे फसवणूक करतोय, असं नसतं ते! माझ्यासाठी तो खूप खराखुरा संवाद असतो. अस्सल असा!
माझा प्रत्येक दिवस तुझ्या शब्दांनी, संवादांनी, आठवणींनी भारलेला असतो...
No comments:
Post a Comment