१९९४.
तेव्हा चौथीत होतो. दूरदर्शनवर 'चंद्रकांता' मालिका सुरु झाली होती. इरफान खानला पहिल्यांदा त्या छोट्या पडद्यावर पाहिलं. त्याने बद्रीनाथ-सोमनाथ असा एक डबल रोल केला होता. त्या पात्राच्या अंगावर छोटे चमकदार गोळे लटकवलेले असायचे. तो त्यातला एकेक तोडून फेकायचा आणि ते बॉम्बसारखे फुटायचे. अंगावर लटकलेले बॉम्ब! मला भारी फॅसिनेशन झालं होतं त्याचं.
तो इरफान डोक्यात कुठेतरी नोंदला गेला!
आठ वर्षांनंतर माटुंग्याच्या स्टारसिटी थेटरमध्ये 'कसूर' बघत होतो. तेव्हा इरफान कोर्ट सीनमध्ये समोर आला. पब्लिक प्रॉसिक्यूटर. करारी नजर आणि कॉन्फीडन्ट! हा चंद्रकांतामधला गोळेवाला. मी अोळखलं...
त्यानंतर तो दिसला 'आन - मेन अॅट वर्क' या चित्रपटात! त्यानं तारवटलेल्या-मोठ्या डोळ्यांचा, थंड डोक्याचा, खूनशी खलनायक ताकदीनं उभा केला होता. इरफान खऱ्या अर्थाने भेटला तो इथे! खऱ्या अर्थाने यासाठी की त्यानंतर तो कधीच विस्मृतीत गेला नाही.
इरफानचे डोळे कायच्या काय जखडून ठेवायचे! त्याला शब्दबंबाळ संवादांची गरज कधीच नव्हती. क्रौर्य, विषाद, आनंद, लोभ, मनातला गुंता असं कितीसं सारं त्यानं त्याच्या एकटक पाहण्यातून व्यक्त केलं. त्यानं जेवढा टोकाचा विखार व्यक्त केला असेल तेवढीच सालस आणि इनोसन्ट व्यक्तीरेखाही रंगवली.
इरफानचा अभिनय त्याच्यापासून वेगळं काढता येणं शक्य व्हायचं नाही. तो अमूक अमूक पद्धतीचं पात्रं रंगवतोय हे ठासून सांगण्याची गरज नसायची. तो सहज पडद्यावर यायचा आणि केवळ त्या पात्रासारखा 'असायचा'! त्याचं तसं असणंच पुरेसं व्हायचं. म्हणूनच त्याला कधी 'पिक्चरमधली एन्ट्री' किंवा त्यासाठी बडवलेलं स्पेशल संगीत वगैरे असं लागलं नाही.
कुठल्याशा कार्यक्रमात शाहरुख म्हणाला होता. आम्ही अॅक्टींग करायची म्हणून ही एवढी मेहनत करत, गळे ताणत संवाद म्हणतो आणि हा इरफान येतो. काही वेगळं न करता नुसते संवाद म्हणतो आणि लोक याची तारीफ करतात. खरंय! तो सहज होता! त्याला हवं तेव्हा गूढ असणं, लोभस हसणं, नितळ वागणं सारं सहज साध्य होतं.
आज तो गेला! लोकं म्हणतात विश्वास बसत नाही अजून. लोकांना नसते ना सवय एवढ्या खरेपणाची! मुलामा दिलेलं, वर्खाखाली झाकलेलं, उसनं अवसानं घेतलेलं काहीतरी पाहण्यात जन्म निघून चाललेला असतो. मग 'अरे भय्याऽऽऽ!' असा पडद्यावरुन आवाज येतो. आणि हळुहळू त्याच्या शेजारी उभी राहणारी मोठी नावं सपक वाटू लागतात.
मान वर करुन पाहावीत अशी माणसं आधीच कमी असतात. म्हणूनच तो गेल्यानंतर रितं रितं वाटतंय. कुठंतरी जोडलेला धागा तुटून आत काहीतरी अधांतरी लोंबकळत राहावं असं...
वय वर्ष त्रेपन्न! आताशी तर बैठक बसत होती. अर्ध्यात मोडली!
थोड्या वेळापूर्वी बातमी वाचली. इरफान खान यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. जे काही अस्तित्व उरलं होतं, तेही लोप पावलं.
आता उरलाय तो 'लाईफ इन मेट्रो'मधला बडबड्या मॉन्टी,
'पिकू'तला स्टेरिंगमागे बसलेला राणा
'कारवाँ'मधला साधासुधा शौकत
'करीब करीब...' मधला 'घनघोर इश्क' म्हणणारा योगी
'नेमसेक'मधला अशोक
'लाईफ अॉफ पाय'मधला पाय पटेल
साजन फर्नांडीस,
पान सिंग तोमर,
अश्वीन कुमार,
चंपक बन्सल...
आणि इरफानचा तो आवाज
'अरे भय्याऽऽऽ'!
तेव्हा चौथीत होतो. दूरदर्शनवर 'चंद्रकांता' मालिका सुरु झाली होती. इरफान खानला पहिल्यांदा त्या छोट्या पडद्यावर पाहिलं. त्याने बद्रीनाथ-सोमनाथ असा एक डबल रोल केला होता. त्या पात्राच्या अंगावर छोटे चमकदार गोळे लटकवलेले असायचे. तो त्यातला एकेक तोडून फेकायचा आणि ते बॉम्बसारखे फुटायचे. अंगावर लटकलेले बॉम्ब! मला भारी फॅसिनेशन झालं होतं त्याचं.
तो इरफान डोक्यात कुठेतरी नोंदला गेला!
आठ वर्षांनंतर माटुंग्याच्या स्टारसिटी थेटरमध्ये 'कसूर' बघत होतो. तेव्हा इरफान कोर्ट सीनमध्ये समोर आला. पब्लिक प्रॉसिक्यूटर. करारी नजर आणि कॉन्फीडन्ट! हा चंद्रकांतामधला गोळेवाला. मी अोळखलं...
त्यानंतर तो दिसला 'आन - मेन अॅट वर्क' या चित्रपटात! त्यानं तारवटलेल्या-मोठ्या डोळ्यांचा, थंड डोक्याचा, खूनशी खलनायक ताकदीनं उभा केला होता. इरफान खऱ्या अर्थाने भेटला तो इथे! खऱ्या अर्थाने यासाठी की त्यानंतर तो कधीच विस्मृतीत गेला नाही.
इरफानचे डोळे कायच्या काय जखडून ठेवायचे! त्याला शब्दबंबाळ संवादांची गरज कधीच नव्हती. क्रौर्य, विषाद, आनंद, लोभ, मनातला गुंता असं कितीसं सारं त्यानं त्याच्या एकटक पाहण्यातून व्यक्त केलं. त्यानं जेवढा टोकाचा विखार व्यक्त केला असेल तेवढीच सालस आणि इनोसन्ट व्यक्तीरेखाही रंगवली.
इरफानचा अभिनय त्याच्यापासून वेगळं काढता येणं शक्य व्हायचं नाही. तो अमूक अमूक पद्धतीचं पात्रं रंगवतोय हे ठासून सांगण्याची गरज नसायची. तो सहज पडद्यावर यायचा आणि केवळ त्या पात्रासारखा 'असायचा'! त्याचं तसं असणंच पुरेसं व्हायचं. म्हणूनच त्याला कधी 'पिक्चरमधली एन्ट्री' किंवा त्यासाठी बडवलेलं स्पेशल संगीत वगैरे असं लागलं नाही.
कुठल्याशा कार्यक्रमात शाहरुख म्हणाला होता. आम्ही अॅक्टींग करायची म्हणून ही एवढी मेहनत करत, गळे ताणत संवाद म्हणतो आणि हा इरफान येतो. काही वेगळं न करता नुसते संवाद म्हणतो आणि लोक याची तारीफ करतात. खरंय! तो सहज होता! त्याला हवं तेव्हा गूढ असणं, लोभस हसणं, नितळ वागणं सारं सहज साध्य होतं.
आज तो गेला! लोकं म्हणतात विश्वास बसत नाही अजून. लोकांना नसते ना सवय एवढ्या खरेपणाची! मुलामा दिलेलं, वर्खाखाली झाकलेलं, उसनं अवसानं घेतलेलं काहीतरी पाहण्यात जन्म निघून चाललेला असतो. मग 'अरे भय्याऽऽऽ!' असा पडद्यावरुन आवाज येतो. आणि हळुहळू त्याच्या शेजारी उभी राहणारी मोठी नावं सपक वाटू लागतात.
मान वर करुन पाहावीत अशी माणसं आधीच कमी असतात. म्हणूनच तो गेल्यानंतर रितं रितं वाटतंय. कुठंतरी जोडलेला धागा तुटून आत काहीतरी अधांतरी लोंबकळत राहावं असं...
वय वर्ष त्रेपन्न! आताशी तर बैठक बसत होती. अर्ध्यात मोडली!
थोड्या वेळापूर्वी बातमी वाचली. इरफान खान यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. जे काही अस्तित्व उरलं होतं, तेही लोप पावलं.
आता उरलाय तो 'लाईफ इन मेट्रो'मधला बडबड्या मॉन्टी,
'पिकू'तला स्टेरिंगमागे बसलेला राणा
'कारवाँ'मधला साधासुधा शौकत
'करीब करीब...' मधला 'घनघोर इश्क' म्हणणारा योगी
'नेमसेक'मधला अशोक
'लाईफ अॉफ पाय'मधला पाय पटेल
साजन फर्नांडीस,
पान सिंग तोमर,
अश्वीन कुमार,
चंपक बन्सल...
आणि इरफानचा तो आवाज
'अरे भय्याऽऽऽ'!

No comments:
Post a Comment