Tuesday, May 28, 2013

आडवाट

नात्‍यात आणि भावनेत
माणसं नेहमीच गल्‍लत करतात
कधीकधी भावनेला नातं ठरवण्‍याचा
शहाणपणाही करतात

प्रेम ही भावना आहे
अन् मैत्री हे नातं
हे कळत असेल का हो त्‍यांना?
पण भानातून नेमकं निसटून जातं

नाणं एकच असलं
तरी बाजू असतात दोन
म्‍हणून दोन्‍ही बाजूंना एकच म्‍हणण्‍याचा
वेडेपणा करतं का कोण?

लोकं त्‍यांच्‍या कुवतीप्रमाणं
नात्‍यांचे अर्थ लावू पाहतात
जे त्‍यांना हवंय
तेच चित्र गिरवत राहतात

तुमच्‍या-माझ्या मर्जीनं
आकार घेईल ते चित्र कसलं?
चित्रं तर उमटत जात असत आपोआप
त्‍याच्‍या स्‍वतःच्‍या मर्जीनं

स्‍वतःच्‍या बुद्धीचे निकष लावून
कशी कळतील नाती?
कधीतरी पाहू या ना त्‍यांचा रंग
कधीतरी समजून घेऊ त्‍यांचीही गती

पण उगा का नाव ठेऊ त्‍यांना?
जर त्‍यांच्‍याकडे दुसरा रस्‍ताच नसेल
आता दोष कुणाचा म्‍हणायचा?
मीच जर आडवाटेने जात असेन...!


No comments:

Post a Comment