Tuesday, May 3, 2011

अव्‍यक्‍त .......

    दोघे रेस्टॉरंटच्या एक कोप-यात बसले होते. फारशी वर्दळ नव्हती. ती पुढ्यातल्या कॉफीच्या कपमध्ये नजर गुंतवून बसलेली. तो तिच्याकडे एकटक बघत होता. मग तो हलकेच खाकरला. आवाजानं ती भानावर आली.
    ‘‘काय झालंय ग तुला? स्पष्ट सांग पाहू.’’
    ‘‘काही नाही.’’ ती जड आवाजात म्‍हणाली.
    ‘‘हे बघ वैशू. कालपासून तुला ऑब्जर्व्ह करतोय. कुठलीतरी गोष्ट तुझ्या मनात सलतेय. काल कॉलेजची  गेट टूगेदर पार्टी झाली. एवढ्या वर्षांनंतर सगळे भेटले, पण तू कुणाशीच धड बोलली नाहीस. काय झालंय काय तुला?’’
     ‘‘असं काही नाही रे!’’ ती दाटलेल्‍या आवाजात म्‍हणाली, पण तिचा तो नकार दुबळा होता. त्यानं ते चटकन ओळखलं.
     ‘‘हे बघं, त्‍या थापा तुझ्या नव-याला मार. मला नको. तुला कॉलेजपासून ओळखतोय मी. अगं, इतरांना नाही, निदान मलातरी सांग..... बोल, मन हलकं होईल तुझं.’’
    तिनं रूमालानं डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि शांत आवाजात म्‍हणाली, ‘‘सम्‍या...... राजेशला माझ्याशी लग्न करायचं होतं.’’
    ‘‘कोण? आपला राजेश? राजेश इनामदार? काय म्हणतेस काय?’’ तो ऐकून उडालाच.....


     ....... ते कॉलेजमध्‍ये असताना त्‍यांच्‍या कोरग्रुपमधला राजेश इनामदार. थोडा हळवा, थोडा विचारी पण अबोल. कविता लिहायचा. स्‍वतःचं चाली लावायचा. खूप आर्तता असायची त्‍याच्‍या शब्‍दांमध्‍ये. निवांत जागी गप्‍पांचा फड जमला, की याच्‍या हळूवार कविता सगळ्यांचंच भान हरपायच्‍या. कॉलेजमध्‍ये अनेक मुलींना आवडायचा तो. पण त्‍यानं कुणालाच दाद दिली नव्‍हती. अशी कुजबुज होती, कि त्‍याला कोणीतरी आवडायचं, पण ती कोण होती हे अखेरपर्यंत कुणालाच नाही समजलं. आता एवढ्या वर्षांनंतर ती मुलगी वैशाली होती हे ऐकून समीरही आश्‍चर्यचकित झाला.
    ‘‘काल गेट टूगेदरमध्ये स्वाती भेटली होती.’’ वैशाली सांगत होती. ‘‘ती त्‍याची घनिष्‍ठ मैत्रीण. राजेश अजून लग्नाचं मनावर घेत नाही म्हणून सहज तिला विचारलं, तर कसल्‍याशा टेन्‍शमध्‍ये वाटली. खोदून विचारलं तेव्‍हा तिनं हे सांगितलं मला.’’
     ‘‘सम्या, तेव्‍हा आपण सगळे एकत्रच होतो.... पण तो अखेरपर्यंत अबोलच राहिला. किती घुसमट झाली असेल त्‍याची? जास्‍त वाईट याचं वाटतंय, की माझं लग्न झालं तरीही तो माझ्यातच गुंतलाय. त्याला वाटतंय, की अशा मन:स्थितीत त्यानं कुणाशी लग्न केलं तर त्या मुलीवर तो अन्याय असेल, म्‍हणून तो लग्‍नाचा विचारही मनात आणत नाहीए.’’
     ‘‘कमाल आहे त्‍याची. मलाही कधी बोलला नाही तो......... पण वैशू, तू का एवढी अस्वस्थ होतेस? त्यानं त्याच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या नाहीत यात तुझा दोष आहे का?’’
    ‘‘वाईट यासाठी वाटतंय, की असं कुणामध्‍येतरी अडकणं काय असतं हे मी समजू शकते. त्या अडकलेल्या जीवाच्या यातना कळतायत रे मला! त्यानं मला ते का सांगितलं नसेल तेही समजतंय. रोज समोरासमोर भेटावं, पण मैत्री आणि प्रेम यांच्‍या कचाट्यात अडकून तोंडातून शब्‍द फुटू नयेत, हे अगतिकपण किती जीवघेणं असतं याची कल्‍पना नाही तुला. त्‍याच्‍या भावना आणि दुःख मला तिव्रतेनं जाणवतंय. मी समोर असतानाही त्‍याला त्‍याच्‍या भावना उघड करायला जमल्‍या नाहीत. ते कोंदटलेपण काय असतं, ते या क्षणीही अनुभवू शकते मी आणि त्‍याचाच त्रास होताय मला.’’
     ‘‘तुला तो आवडायचा का तेव्‍हा?’’
     ‘‘तो नाही, पण दुसरं कुणीतरी आवडायचं मला.’’ ती म्‍हणाली.
     काही क्षण त्याला तिचे शब्द कळलेच नाहीत. ‘‘म्‍हणजे? कॉलेजमध्‍ये असताना तुझं कुणावरतरी प्रेम होतं?’’ त्‍यानं अविश्‍वासानं विचारलं. त्‍याच्‍या आवाजात अविश्‍वास तर होताच, पण सोबत थोडं दुखावलेपणंही होतं. तिनं आपल्‍यापासून काहीतरी लपवून ठेवावं आणि तेदेखील इतकी वर्ष हे त्‍याला बोचलं असावं.
     ‘‘तू माझ्यापासून एवढी वर्ष हे लपवून ठेवलंस वैशू? मला आश्‍चर्य वाटतंय. मला वाटायचं की, आयुष्‍यातली कुठलीही बाब शेअर करावी इतकी आपली मैत्री गहिरी आहे. पण आज जाणवलं, तसं काहीच नाहीए. एवढी वर्ष मी तुला एवढा परकाच राहिलो ना?’’ त्‍याला लागलेला चटका  त्‍याच्‍या आवाजातून साफ जाणवत होता.
     ‘‘असं नको रे बोलूस.’’ ती काकुळतीला येऊन म्हणाली. ‘‘तुला सांगावसं अनेकदा वाटलं, पण खूप प्रयत्‍नांनी स्‍वतःला रोखलं मी. तुला सांगणं मला जमलंच नाही.’’
     ‘‘अगं पण का?’’
     ‘‘...................’’
     ‘‘आता बोल ना!’’
     ‘‘कारण तो तूच होतास सम्‍या.’’ तिनं गदगदलेल्‍या आवाजात म्‍हटलं.
     तो जागेवरच गोठून गेला. तिच्या त्या शब्दांबरोबर ह्रदयापासून निघालेली एक शीतलहर त्‍याचं सर्वांग बधिर करत गेली. सारं जग त्‍याच्‍या भोवती क्षणार्धात गर्रकन फिरलं. आत्ता जे शब्द ऐकू आले त्याचा अर्थ लावायला त्याला बराच वेळ लागला. त्याच चित्त ठिकाणावर आलं तेव्हा ती समोर मान खाली घालून बसली होती.
     दोघं अबोल होते. पण आत कसलीशी वादळं थैमान घालत होती. ती शांतता त्‍याच्‍या अंगावर येऊ लागली.
     ‘‘मला माहित नव्‍हतं की तू..... पण कधीपासून?.... मला सांगितलं का नाहीस?’’ तो शब्‍दागणिक अस्‍वस्‍थ होत गेला.
     ‘‘कसं सांगणार होते रे मी?’’ ती कातर आवाजात बोलू लागली. ‘‘कॉलेजपासूनचा तू माझा सगळ्यात जवळचा मित्र. किती गोष्‍टी आपण एकत्र शेअर केल्‍या! आधी केवळ मित्र असलेला तू नंतर माझ्यासाठी आकर्षण होत गेलास. तुझा सहवास, तुझं वागणं, तुझी समजून घेण्‍याची वृत्‍ती, थोडासा चंचलपणा सगळंच भावत गेलं. तारूण्‍यसुलभ गोष्‍ट म्‍हणून मी मनाला समजवण्‍याचा प्रयत्‍न केला, पण नाही जमलं मला ते!’’
     ‘‘मी तुझा अनेकवेळा अंदाज घेतला. पण लग्‍नाविषयीचे तुझे विचार घरच्‍यांच्‍या मतांवर अवलंबून होते. त्‍यात तू एकदा म्‍हटलंस, की तू प्रेमविवाह करणार नाहीस आणि मी वेडी.... तुझा तो अखेरचा निर्णय आहे, असं समजून गप्‍प बसले. तुला कॉलेजमध्‍ये आवडणारी ती मुलगी आणि तिच्‍याजवळ जाण्‍याचे ते तुझे प्रयत्‍न, यांना मी नेहमी साथ देत गेले. पण मनात काहीवेळा एक स्‍वार्थी विचारही यायचा. असं वाटायचं, की ती तुला कधीच मिळू नये आणि मी तुला अशीच आयुष्‍यभर साथ करत जावी.’’
     ‘‘तुझ्या डोळ्यांत मी स्‍वतःला शोधत राहिले, पण त्‍यात एका मैत्रिणीशिवाय मला कधीच काही दिसलं नाही. त्‍यावेळी तुझा ओझरता स्‍पर्श मला हवाहवासा वाटायचा, पण तरीही मी स्‍वतःला तुझ्यापासून प्रकर्षानं लांब ठेवत गेले. त्‍या काळात तुझी आणि माझी खूप भांडणं झालेली होती..... आठवतात?....... मीच मुद्दाम उकरून काढलेली. रोज तुझ्याशी बोलायला मला विषय हवा असणं आणि तुझ्यापासून दूर रहायचा एक वेडा प्रयत्‍न, अशी ती माझी दुहेरी धडपड असायची. मनात भावनांचा कल्‍लोळ उडालेला असताना तू माझा हात हातात धरून तुझ्या त्‍या मैत्रिणीबद्दल बोलत बसायचास. कसं सांगू तुला शब्‍दामध्‍ये, की एकाचवेळी तुझ्यात गुरफटणं आणि तुझ्यापासून तिळ तिळ तुटणं हा काय अनुभव असतो ते.’’
     ‘‘त्‍यानंतरही अनेकदा वाटलं, की तुला एकदा सगळं सारं काही स्‍पष्‍ट सांगावं, पण नाही रे धीर झाला मला. तू नाही म्‍हणालास तर? माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलास तर? रागावून मैत्री तोडून गेलास तर? अशी प्रश्‍नांची माळच उभी रहायची मनामध्‍ये. तुला मनातलं सांगितल्‍यानंतर होणा-या परिणामांची अनिश्चितता मला पेलवत नव्‍हती आणि काही झालं तरी मला ही मैत्री अजिबात तोडायची नव्‍हती. स्‍वतःच्‍याच मनानं तयार केलेल्‍या दुहेरी पेचात अडकत गेले आणि आजही तशीच अडकून आहे.’’
     त्‍याचा जागेवरच दगड होवून गेलेला. एवढी वर्ष कोंडून ठेवलेली भावना, तीही आपल्‍याबद्दलची आणि आपल्‍यामुळेच कोंडून राहिलेली. तिचं स्‍वागत करावं, नकार द्यावा, की तिचं दुखावलेलं मन सांभाळावं. त्‍याला काहीच समजत नव्‍हतं.
     ती बोलतच होती. ‘‘खूप अस्‍वस्‍थ होते रे मी इतकी वर्ष. कुणालातरी सांगावं म्‍हटलं तरी जमत नव्‍हतं. एवढी मनाच्‍या जवळची गोष्‍ट समजून घेईल असं दुसरं जीवाभावाचं कुणी नव्‍हतंच. तुझ्या वाट्याचं असूनही तुला सांगू शकत नव्‍हते. माझं लग्‍न झालंय हे माहितीय मला. पण मी त्‍याच्‍याशी प्रतारणा करत नाहीए. त्‍यानं मला खूप प्रेम दिलंय आणि मीदेखील त्‍याबद्दल त्‍याची कृतज्ञ आहे. मी फक्‍त माझ्या मनाची ही भेग त्‍याच्‍यापासून दडवून ठेवलीय. जशी तुझ्यापासून लपवून ठेवली होती तशी.’’

     मग बराच काळ घड्याळाचे काटे आपल्‍या गतीने धावत राहिले. आकाशात सांजरंग दाटून आला. 
     ‘‘पण वैशू, आता यातून साध्‍य काय?’’ इतका वेळ गप्‍प असलेला तो आताशानं बोलला.
     ‘‘साध्‍य?’’ ती उद्वीग्‍नपणे हसली. ‘‘काहीच नाही. ज्‍या क्षणी ते घडू इच्‍छीत होतं तेव्‍हा ते मी घडू दिलं नाही. खूप प्रांजळ भावना होती माझी! मला फक्‍त हे आयुष्‍़य तुझ्यासोबत जगायचं होतं. माझा प्रत्‍येक क्षण तुझ्याजोडीनं साजरा करायचा होता. खूप सुरेख कल्‍पना केल्‍या होत्‍या मनाशी. त्‍या प्रत्‍यक्षात आणायच्‍या होत्‍या. पण इच्‍छीलेलं सगळं घडत नसतं.’’
     पुन्‍हा शांतता.
     ‘‘सम्‍या, हे ऐकल्‍यावर तू मला सोडून जाणार नाहीस ना?’’
     त्‍या प्रश्‍नासरशी त्यानं तिच्याकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात दाटलेले असंख्य प्रश्न त्याला दिसले. जोडीला साकळलेली दुराव्याची भीती.
     ‘‘तू माझ्या जवळ येऊ शकला नाहीस, निदान याहून दूर तरी जाऊ नकोस.’’
      तिच्‍या आवाजातली अगतिकता आता लपत नव्‍हती. त्‍यालाही ती जाणवली.
     ‘‘तू मला एकेकाळी आवडत होतास, म्‍हणून मी आज हे सगळं सांगितलं, असं नकोस समजू. माझ्या सगळ्यात जवळच्‍या मित्रापासून मी एक गोष्‍ट लपवून ठेवली होती. ती त्‍याचीच होती. ते समजणं त्‍याचा हक्‍क होता, म्‍हणून बोलले. प्लिज......... तू..........’’
     त्‍यानं हलकेच तिच्‍या हातांवर हात ठेवला.
     कदाचित आता शब्‍दांचं काम संपलं होतं.
     किती आश्‍वासक स्‍पर्श होता त्‍याचा! कदाचित या एकाच क्षणासाठी ती थांबलेली असावी. तिला पुन्‍हा भरून आलं. तिनं त्‍याच्‍या डोळ्यात पाहिलं. अनेक वर्षांची आपली अतृप्‍त इच्‍छा पूर्ण करून घेतल्‍याप्रमाणं.
     बराच काळ तिच्‍या गालांवरून आसवं ओघळत राहिली. त्‍यानंही तो हात तसाच राहू दिला. ते दोघे परस्परांच्या खूप जवळ बसले होते, पण त्यांच्यातलं कित्येक मैलांचं अंतर त्या दोघांनाही जाणवत होत. कधीच न तोडलं जाणारं अंतर. आपण आयुष्‍यात परस्‍परांच्‍या जवळ येऊ शकलो नाही, पण निदान दूरवरून एकमेकांना पाहू तरी शकतो.
     रेस्‍टॉरंटच्‍या काचेतून समोरचा समुद्र आणि त्‍या पलिकडचं क्षीतीज नजरेस पडत होतं. सूर्य कलू लागलेला. ती क्षणभर त्‍या दृश्‍याकडे पहात राहिली. समोर दिसणारी जमिन आणि क्षीतीज, दोहोंवर तिला निराशा दाटलेली दिसली. एक फसवी भेट... उगाच तिच्‍या मनात आलं.
     तिनं पुन्‍हा त्‍याच्‍याकडे पाहिलं. तिला बरंच काही बोलायचं होतं. सांगायचं होतं. पण गळा दाटून आला होता. ती कशीबशी एवढंच बोलू शकली.
     ‘‘थँक्‍स सम्‍या!’’

     तिनं पर्स उचलली.
     ‘‘कुठे निघालीस?’’
     ‘‘आज एवढ्या वर्षांनंतर माझा हक्‍क मला मिळाला. तुला एकवार हे सांगण्‍याचा, की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आणखी कुणीतरी अडकलंय या चक्रात. त्या अस्वस्थ मनाला नि:श्वास लाभायला हवा.’’
     तिने डोळे पुसले आणि ती निघून गेली. काहीशी मोकळी, निश्चिंत दिसली ती जाताना. तो तसाच बसून होता. बराच वेळ. कुठतरी एकटक पहात. काहीतरी पुन्हा हरवल्‍यासारखा.
      प्रकाश अंधुक होऊ लागलेला. संकोचलेल्‍या, व्‍याकूळलेल्‍या जिवांना अंधारानं आपल्‍या पदराखाली घेतलं. त्‍या अंधाराच्‍या आड त्‍याच्‍या गालावरून पाण्‍याचे ओघळ वहात होते. नेहमीसारखेच. सर्वांच्‍या अपरोक्ष. मात्र आज त्या अश्रूंची व्यथा काहीशी वेगळी होती....
     आपण शोधात असलेल्या फुलपाखराच्या पायांचे ठसे ब-याच दिवसांनतर आपल्याच खांद्यावर दिसावेत तशी...

No comments:

Post a Comment