Wednesday, February 9, 2011

अनोळखी पावलांची रांग

रेश्माला बघायला पाहुणे येणार होते.
तिला काहीतरी लिहून पाठवायचं होतं. पण काही सुचलं नाही.
रात्री हिनाच्या ब्लॉगवर गेलो. हिनाने पोस्ट केलेली एक गझल वाचली.
काहीतरी सुचलं आणि तिला लिहिलं.
तसं पाहिलं तर दोघींसाठी
नाहीतर केवळ माझ्यासाठी.
पण एकाच दिवशी दोघींबद्दल एकच भावना दाटून येणं म्हणजे गम्मतच की!
.....................................
.....................................
.....................................




प्रत्येकाच्या आयुष्याला जोडीदार लागतो.
का? माहित नाही.

तसे आपण एकटे कधीच नसतो. नातेवाईकांचा गोतावळा, मित्रांचा कंपू आपली सोबत करतच असतो. तरीही त्या अनामिकाची आस लागते.
का? माहित नाही.

आपलं मन जिवलग मित्रांकडेही मोकळं करतंच असतो की आपण! तरीही त्याला मनातलं काहीतरी वेगळं सांगावसं वाटत.
का? माहित नाही.

कोसळणारा पाऊस, एकच छत्री, मावळतीचे रंग, हे सगळंच निशब्द करायला पुरेसं. त्या क्षणी एकमेकांशी काहीही बोलण्याची इच्छा नसावी आणि तरीही तो जवळ असावसं वाटावं.
का? माहित नाही.

भन्नाट वाऱ्यात उधाणलेल्या समुद्राच्या काठावरून चालताना दूर क्षीतीजावर सूर्य जेव्हा अस्ताला जात असतो, तेव्हा ते सगळं किती सुंदर आहे हे कुणालातरी जवळ ओढून सांगावस वाटत. त्यानंही ते तितक्याच निरागसपणे अनुभवावं अशी इच्छा असते.
का? माहित नाही.
...
...
...
देवास ठाऊक जोडीदार का लागतात?
पण शेवटी वाळूत उमटलेली अनोळखी पावलांची रांग दूरवर जावून एकात एक मिसळून गेलेली दिसली की पुरे!
हो ना!




2 comments: